शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या घटनांत वाढल्या; विभागातील धक्कादायक आकडेवारी समोर

  छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरूच असून गेल्या सव्वादोन महिन्यात वीसहून अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षभरात १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन पातळीवरून होणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचेही यावरून दिसून येत आहे. त्यामुळे व्यापक आणि ठोस उपाययोजनांची गरज वाटू लागली आहे.




जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक असून सर्वदूर सिंचनाची सोय नाही. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी शेतमालास भाव नाही, या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न पडतो. त्यातच गेल्या तीन ते चार वर्षांपासून अधिकच्या पावसाचा फटका पिकांना बसत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रब्बी हंगामात पिके काढणीला आलेले असतानाच अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या व इतर कारणांमुळे अडचणीत साडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर येत आहे.प्राप्त माहितीनुसार गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघातील २८ वर्षीय शेतकरी नंदू भीमराव लाठे (रा. बोदवड) यांनी विषारी औषध प्राशन केले. घाटीत उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नऊ मार्च रोजी शेतकरी आत्महत्येच्या दोन घटना कृषीमंत्र्यांच्या या जिल्ह्यात घडल्या. यात गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकरी अशोक सिरसाठ (वय ४५) यांनी गळफास घेत आत्महत्या केली तर, पैठण तालुक्यातील बोकूळ जळगाव येथील शेतकरी सखाहरी बाबुराव नागे यांनी विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवल्याचे पोलिस सूत्रांनी सांगत अधिक तपास सुरू असल्याचे नमूद केले. यासह विविध कारणांमुळे एक जानेवारीपासून ते २० फेब्रुवारीपर्यंत १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहेत. यापैकी दहा आत्महत्यामागील कारण हे कर्जबाजारीपणा असल्याचे समोर आले आहे. तर अन्य प्रकरणांमध्ये समितीमार्फत चौकशी केली जात आहे. अवकाळीमुळे नुकसान गव्हासह अन्य पिके काढणीला असतानाच रविवारी (५ मार्च) व सोमवारी पहाटेपर्यंत (६ मार्च) पडलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ३ हजार ११८ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत. यात पैठण तालुक्यातील २ हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. गंगापूर तालुक्यातील सुमारे ७९० हेक्टर, वैजापूर ७० हेक्टर, तर कन्नड तालुक्यातील ७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही पाऊस झाला, परंतु प्राथमिक अहवालात या तालुक्याचा समावेश नाही.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,