शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आज तोडगा निघण्याची शक्यता; आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

 


मुंबईः विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणारी बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक आज, बुधवारी होणार असून या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करण्याची मागणी मंगळवारी विधानसभेत लावून धरली.वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी वीजपुरवठा, शेती कर्जमाफी यांसह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलिस पाटील यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करून शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेतर्फे लाँग मार्च सुरू करण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चाप्रश्नी अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.शेतकऱ्यांसोबत बोलावलेली बैठक रद्द केल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकाले यांनी सभागृहाला दिली. मात्र आजची बैठक रद्द झाली आहे. उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री व सचिवांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या मोर्चाला मुंबईत यावे लागणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्यास आहे त्या जागेवरच मोर्चा स्थगित करण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी सभागृहास दिली.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन