निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात

 जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात



पाताळगंगा न्यूज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : २ ऑक्टोबर 

               आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून, जिल्ह्यात २ ऑक्टोबर २०२३ (महात्मा गांधी जयंती) पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवात करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग दुरीकरणाकरिता जिल्हा कृती नियोजन आराखडा (District Strategic Plan For Leprosy Elimination by 2027) तयार करण्यात आला आहे. 
                 तयार कृती नियोजणानुसार कुष्ठरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट सन २०२७ पर्यंत गाठायचे आहे. रायगड जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये एकूण ८४५ नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचार देण्यात आले. चालू वर्षात २८९ रुग्ण उपचार घेत आहेत. काय आहे नावीन्यपूर्ण रायगड निकुष्ठ मित्र उपक्रम? हजारो वर्षांपासून कुष्ठरोगाने मानवतेला प्रभावित केले आहे. कुष्ठरोग हा ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक कलंकाशी संबंधित आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून कुष्ठरोग उपचाराने पूर्ण पणे बरा होणारा आजार आहे.      
                    आज नियमित उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोग फारसा संसर्गजन्य नसतानाही आणि रोगजनकता कमी असूनही, आजही या रोगाशी संबंधित मानला जाणारा कलंक आणि भेदभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या कलंकामुळे, कुष्ठरोग एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक कार्यात सहभाग घेण्यावर परिणाम करू शकतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या जीवनावर देखील परिणाम करू शकतो. कुष्ठरोग असलेल्या लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांचा धोका जास्त असतो. 
                   सामाजिक कलंक रोजगार मिळवण्याच्या समस्या, आर्थिक अडचणी आणि सामाजिक अलगाव इत्यादी करीता कारणीभूत ठरू शकतो. भेदभाव कमी करण्यासाठी आणि कुष्ठरोगाच्या सभोवतालचा कलंक कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, कुष्ठरोग असलेल्या लोकांसाठी खूप मोठी  सामाजिक मदत होऊ शकते. प्रभावी उपचार असूनही, आजही कुष्ठरोगाचा कलंक बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. गरिबीमुळे सामाजिक कलंक वाढण्याची शक्यता आहे. बहिष्कृतपणाची भीती, नोकरी गमावणे किंवा कुटुंब आणि समाजातून नाकारले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, इत्यादी ही सामाजिक धारणांवर प्रभाव टाकत आसतात. 
                  कुष्ठरोग कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कुष्ठरोग निर्मूलन धोरणामध्ये असे नमूद केले आहे  कि, सुधारित उपचार पद्धतीचा अवलंब करावा आणि कुष्ठरोग झालेल्या लोकांवरील कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना कराव्यात. मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पेनेतून क्षय रुग्णांसाठी अत्यंत लाभदायी निक्षय मित्र उपक्रम देशात यशस्वी पणे राबविला जात आहे. त्याच्याच धर्तीवर रायगड जिल्यात कुष्ठरुग्णांसाठी रायगड निकुष्ठ मित्र उपक्रम हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
                  या उपक्रमाचा मुख्य उद्देश अज्ञानामुळे कुष्ठरोगाबद्दल असणारा भेदभाव आणि कलंक कमी करणे हा आहे. रायगड निकुष्ठ मित्र म्हणून पुढे आलेले स्वयंसेवक नियमित उपचार घेणाऱ्या कुष्ठरुग्णांच्या घरी जातात, सदरील रुग्णाला अन्नाची टोपली भेट म्हणून देतात, यामध्ये  प्रामुख्याने भात, धान्य, दाळी, फळे, इत्यादी चा समावेश असतो. अन्नाची टोपली दिल्यानंतर सदरील रुग्णाच्या घरी, रुग्णासोबत बसून प्रातिनिधिक स्वरूपात चहा, नाश्ता, किंवा जेवण इत्यादी घेतात. या करिता सर्वप्रथम रुग्णाची आणि रुग्णच्या नातेवाईकांची सहमती घेतली जाते. 
              या चहा पानासाठी रायगड निकुष्ठ मित्रा सोबत त्या गावातील लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, शासकीय कर्मचारी, इत्यादी व्यक्ती उपस्थित राहतील. उपचार घेत असलेले रुग्ण हे इतरांना आजाराचा प्रसार करीत नसतात.  आशा प्रकारच्या चहापानामुळे कुष्ठ रुग्णाबद्दल होणारा भेदभाव कमी होण्यास नक्की मदत होणार आहे.
रायगड निकुष्ठ मित्र म्हणून स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीषा विखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास देवमाने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे तसेच सहाय्यक संचालक आरोग्य (कुष्ठरोग) डॉ प्रताप शिंदे यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे.
                माणुसकी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक ही यात सहभागी होणार आहेत असे डॉ राजाराम हूलवाण यांनी  नमूद नमूद केले आहे. आजपर्यंत एकूण १०९ रायगड निकुष्ठ मित्राची नोंदणी झाली आहे, आणि येणाऱ्या काळात विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आणखी निकुष्ठ  मित्र पुढे येतील यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.जास्तीस्त जास्त स्वयंसेवकांनी रायगड निकुष्ठ मित्र म्हणून पुढे यावे आणि कुष्ठरोग दुरीकरणासाठी आपले योगदान द्यावे असे आहवान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी केले आहे.  

          कुष्ठरोगाबाबत थोडक्यात 

कुष्ठरोग-  या आजाराला हॅन्सन रोग म्हणूनही ओळखले जाते, हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणूंद्वारे होणारा दीर्घकालीन संसर्ग आहे. संसर्गामुळे नर्व, त्वचा आणि डोळे यांचे नुकसान होऊ शकते. त्वचेवरील न खाजणारा न दुखणारा लालसर किंवा फिक्कट पांढरा चट्टा हे कुष्ठरोगाचे लक्षण असू शकते. मज्जातंतूच्या नुकसानीमुळे वेदना जाणवण्याची क्षमता कमी होऊ शकते, तसेच त्या भागाची संवेदना कमी होते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हातपायांचे भाग वारंवार दुखापत झाल्यामुळे किंवा लक्षात न आलेल्या जखमांमुळे संक्रमण होऊ शकते.
               कुष्ठरोगाची लक्षणे दिसून येण्यास जंतूसंसर्ग झाल्यानंतर काही महिने ते २० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो.
उपचार- बहुऔषध थेरपी औषधोपचार यामध्ये रिफाम्पिसिन, डॅप्सोन, क्लोफाझिमाइन  ही औषधी देण्यात. या आजाराचे दोन मुख्य प्रकार आहेत - पॉसिबॅसिलरी आणि मल्टीबॅसिलरी. पॉसिबॅसिलरी आजार असलेल्या व्यक्तीच्या त्वचेवर पाच किंवा त्यापेक्षा कमी बधीर चट्टे असतात, तर मल्टीबॅसिलरी आजार असलेल्या व्यक्तीच्या त्वचेवर पाच पेक्षा जास्त चट्टे असतात. बहुऔषध थेरपीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. 
                  पॉसिबॅसिलरी कुष्ठरोगाचा औषधोपचार सहा महिन्यांसाठी  केला जातो आणि मल्टीबॅसिलरी कुष्ठरोगावरील उपचारांसाठी १२ महिने औषधे वापरली जातात. हे उपचार सर्व शासकीय रुग्णालयात मोफत दिले जातात. कुष्ठरुग्ण त्यांच्या कुटुंबा समवेत राहू शकतात, मुले शाळेत जाऊ शकतात तसेच त्यांची नियमित कामही करू शकतात मात्र त्यांनी नियमित औषधोपचार घेणे गरजेचे आहे.





Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन