महाराष्ट्राच्या ५७ व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी

 महाराष्ट्राच्या ५७ व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी




पाताळगंगा न्यूज : नवज्योत पिंगळे 
खालापूर : ९ जानेवारी ,

     नागपुर, ९  जानेवारी, महाराष्ट्राच्या ५७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २६,२७,२८ जानेवारीला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सेक्टर १४  व १५, पतंजली फूड फॅक्टरीजवळ, मिहान, सुमठाणा, नागपुर (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानावर केले जात आहे. 
     हा विशाल आध्यात्मिक संत समागम यशस्वी करण्याFसाठी गेल्या २४  डिसेंबर, २०२३ रोजी विधिवत रूपात स्वैच्छिक सेवांचा शुभारंभ झालेला आहे. तेव्हापासूनच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे सदस्य, स्वयंसेवक व भाविक भक्तगण मोठ्या तन्मयतेने, निष्ठेने आणि निष्काम भावनेने समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीमध्ये आपले योगदान देत आहेत. 
       भक्ति व सेवाभावनेच्या इतिहासाची महान परंपरा लाभलेल्या नागपुर नगरीमध्ये प्रथमच  महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. सर्वविदित आहे, की निरंकारी संत समागम एकत्व, प्रेम आणि विश्वबंधुत्वाचे असे एक अनुपम स्वरूप  प्रदर्शित करतो ज्यामध्ये केवळ निरंकारी भक्तच नव्हे तर ईश्वरामध्ये आस्था बाळगणारा प्रत्येक मनुष्य सहभागी होऊन सद्गुरुंच्या शिकवणूकीने प्रेरित होतो आणि आपले जीवन सार्थक बनवतो. 

    या दिव्य संत समागमाची पूर्वतयारी अत्यंत उत्साहात केली जात आहे. आबालवृद्ध भक्तगण हर्षोल्हासाने तन्मयतापूर्वक या सेवांमध्ये भाग घेत आहेत. कुठे मैदानाचे समतलीकरण केले जात आहे तर कुठे स्वच्छता केली जात आहे. काही ठिकाणी मैदानावर आवश्यक तात्पुरत्या मार्गीकांचीही निर्मिती केली जात आहे. या व्यतिरिक्त समागम स्थळावर सत्संग पंडाल, निवासी तंबू, शामियाने इत्यादिंची सुंदर नगरी तयार करणे इत्यादि कार्ये अगदी कुशलतेने केली जात आहेत. भक्तीभावनेने ओतप्रोत सर्व श्रद्धाळु भक्त सेवेला आपले परम सौभाग्य मानून मर्यादापूर्वक सेवा निभावत आहेत. त्यांच्यासाठी सेवा ही काही विवशता किंवा कुठलेही बंधन नाही तर आनंद प्राप्तीची पावन पर्वणी लाभली आहे असे मानून त्यासाठी ते सद्गुरुचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करत आहेत.  
          महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध संस्कृती, सभ्यतांचा एक अनुपम संगम दृष्टीगोचर होईल ज्यामध्ये सहभागी होऊन भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन अलौकिक आनंदाची अनुभूती प्राप्त करतील. यावरुन आपण म्हणू शकतो, की या दिव्य संत समागमाचा उद्देश मानवता व विश्वबंधुत्वाची सुंदर भावना सदृढ करणे हा आहे जो केवळ ब्रह्मानुभूतीद्वारेच शक्य आहे.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान